कंगना रणौत घेणार राज्यपालांची भेट
रविवारी १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)
अभिनेत्री कंगना रणौत रविवारी १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवनावर संध्याकाळी साडेचार वाजता कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे. ‘इंडिया टुडे’नं हे वृत्त दिलं आहे. या भेटीमागचं कारण काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.
दुसरीकडे कंगना बाहेरगावी गेली असताना तिच्या पाली हिल येथील घरातील बेकायदा बांधकामावर कारवाई केलीच कशी? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने बुधवारी पालिकेच्या कृतीबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच कारवाईला स्थगिती दिली. कंगनाच्या खार इथल्या घरातील अनधिकृत बांधकामासंदर्भातही पालिकेने नोटीस बजावल्याचं समजतंय.
Comments
Post a Comment